-
प्रस्तावना
शालेय विद्यार्थ्यांचे भावविश्व समृद्ध करण्याच्या धडपडीतून कथालेखनाचाही संसार मांडणारे उत्फुल्ल मिलींद यादव...समाजनिष्ठ पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता, संस्कृती-परंपरांचा अभ्यासक संवेदनशील कलावंत, प्रयोगशील शिक्षक, निसर्गाशी गूज करू पाहणारा निसर्गमित्र, दमदार गिर्यारोहक, चित्रपट, चित्रकला यातील सौंदर्य चळवळींच्या माध्यमातून संस्कारक्षम वयातल्या मुला-मुलींपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडणारा उत्फुल्ल आस्वादक अशा विविध रुपांत कोल्हापूरस्थित विद्यार्थीप्रिय शिक्षक मिलींद यादव भेटत राहतात. लोकविलक्षण अशी व्यक्त होत राहण्यातली त्यांची असोशी चित्र, शब्द आणि सातत्यपूर्ण लेखनातून वाचकांपुढ्यात येत राहते. आता कथालेखक या नव्या भूमिकेत ते समोर येत आहेत. ‘कथा अंगाखांद्यावरच्या’ हा वास्तव कथांवर बेतलेला त्यांचा लेखसंग्रह प्रकाशित होत आहे. या संग्रहाला त्यांच्या स्नेही गुरुजनाने लिहिलेली ही प्रस्तावना...मिलींद एक अवलिया हरहुन्नरी कलाकार, निर्भीड कार्यकर्ता, स्पष्टवक्ता माणूस. पहिल्या भेटीत मिलींद भेटतो आपल्याला एक टपोरी, उनाड वाटणारा तरुण म्हणून. पुढे मिलींद, मिलींदसर म्हणून भेटतात. आत्ताच्या शिक्षण शास्त्राच्या भाषेत ‘उपक्रमशील शिक्षक’ म्हणावे असे.
मिलींदसर एक दोन तपे एका शाळेत कार्यरत होते. Thinking out of the box हा मिलींदसरांचा उपजत गुण असावा. चौकटीत, शाळेच्या रुटीन नियमावलीत, कोडमध्ये न बसणारा माणूस किंवा त्या चौकटीत न मावणारा शिक्षक. पण चौकट कसलीही आणि कुठलीही असो मिलींद आपल्या मनात जे आहे, ते नवनवीन मुलांना देत राहिले. मध्येच या रुटीनचा आणि मला जे करावयाचे आहे ते, यांचा मेळ बसत नाही म्हटल्यावर मिलींदसरांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. मनासारख्या कामाला सुरुवात केली आणि मुलांच्या विश्वात नव्याने अवतरले.
गोष्टीमागची गोष्ट
एक सृजनशील, विचारी, विचाराची पक्की बैठक आणि दिशा स्पष्ट असलेल्या मिलींद सरांनी लिहायला सुरुवात केली. आपल्या नोकरीच्या कार्यकाळात त्यांनी मुलांशी साधलेला संवाद, मुलांची अंतरंगे उघडून त्यांच्या भावविश्वात त्यांचे रमणे, वावरणे हे सर्व शिक्षणातील प्रयोगच म्हणावे लागतील. मुलांची मने घडविणे, त्यांना संवादी करणे, संवेदनशील बनविणे, समाजशील बनविणे, समाजातील जबाबदार नागरिक बनविणे या खऱ्या शिक्षणासाठी, ज्याला जीवन शिक्षण म्हणता येईल असे पूर्णतः अनौपचारिक शिक्षण मिलींदसरांनी मुलांना दिले. एरवी, जी मुलं बोलत नाहीत. बोलू इच्छित नाहीत किंवा त्यांचा स्तर पाहून इतरांना त्यांच्याशी मैत्री करावी, असे वाटत नाही. अशा मुलांसाठी सर धडपडले. पावलो प्रेयरी या शिक्षण तज्ज्ञाचे एक पुस्तक आहे. ‘Pedagogy of Oppressed’ समाजाच्या तळागाळातील मुलांना बोलता येते. पण त्यांना त्यांचा आवाज नसतो. या तत्त्वज्ञानानुसार या मुलांना जमेत न धरता किंवा त्यांचे तसे असणे गृहीत धरून शिक्षण चालते. ही जगभरची रीत आहे. अशा मुलांशी मिलींद सरांनी वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या पद्धतीने संवाद साधला आहे. मुलांच्या भावविश्वाशी ते समरस झाले आहेत. त्या बाबतच्या गोष्टी त्यांनी लिहिलेल्या ‘अंगा खांद्यावरच्या कथा’ या पुस्तकात आहेत. मुलांचे आत्मभान, सन्मान, मन जपून त्यांना आपल्या मनात स्थान देत सर कार्यरत होते. त्या उपक्रमांचे, घटनांचे, प्रसंगांचे या पुस्तकात वास्तव चित्रण आहे.
आपण फार मोठे काही काम केले. मुलांसाठी खूप कष्ट घेतले, असा अविर्भाव फुशारकी व स्वस्तुती या लेखनात कुठेही नाही. मुलांचे मात्र मन भरून आणि समरसून कौतुक करताना सर जागोजागी दृष्टीस पडले. या मुलामुलींची वेगळी सृष्टी जाणून घेण्याची दृष्टी असलेला एक सच्चा शिक्षक या प्रसंगातून सतत दिसत राहतो.
चटका लावणाऱ्या कथा
या पुस्तकातील काही कथा तर मनाला चटका लावणाऱ्या आहेत. ‘एक शालीन स्नेहभोजन’ या कथेतील शालन ही विद्यार्थिनी आपला जेवणाचा डबा सर्वांसमोर उघडू इच्छित नाही. डबा काढून घेऊन उघडल्यावर शालनची झालेली घालमेल. डबा पाहून भारावलेले सर आणि त्या प्रसंगाला आपली कल्पकता वापरून दिलेल्या शालीन कलाटणीचे वास्तव चित्रण अस्वस्थ करते.
‘आमचा सिकंदर’ या कथेतील श्रीधर पैसे ठेवलेली डबी शोधण्यासाठी, पकडण्यासाठी धप्पकन पाण्यात उडी मारतो. ही गोष्ट मुलांचे प्रसंगानुरूप साहस अधोरेखित करते. ‘चौकातलं भूत’ या कथेतील घोणसीचा आवाज आणि मुलांची प्रचंड घाबरलेली स्थिती यातून सरांनी नरेशला मिठीत घेणे. ही गोष्ट शिक्षकाचे धैर्य तर दाखवतेच, पण पुढे भूत हा कसा भ्रम आहे, हे मुलांना अनुभवातून पटविते. या सर्व कथा मुलं आणि मिलींद सर यांचे बहुपदरी, बहुआयामी बहुअनुभवजन्य ज्ञान देणाऱ्या नावीन्यपूर्ण पद्धती आहेत.
एक कला शिक्षक... भवतालाचे भान असलेला... राजकीय-सामाजिक सजगता जपलेला... निसर्गात रमणारा... जागतिक सिनेमांच्या माध्यमातून मुलांचे जग विस्तारणारा... विद्यार्थ्यांचे मन जाणून घेण्यासाठी परकायाप्रवेश साधतो, तेव्हा त्यातून चटका लावणाऱ्या कथा जन्म घेतात...प्रयोगशीलतेचा अखंड ध्यास
‘Experiencial Learning’ प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे, असा एक शिकण्याच्या पद्धतीतील प्रकार आहे. मुलांच्या विश्वात एकरूप होऊन असे अनुभवजन्य प्रत्यक्षदर्शी ज्ञान सहजपणे देत राहिलेले उपक्रमशील उपद्व्यापी शिक्षक मिलींद आणि त्यांची शिकण्याची आस असलेली मुलं, हा एक शिक्षणातला प्रयोग आहे. ‘तुकाराम’ सिनेमा मुलांना दाखविल्यानंतर ओंकार या विद्यार्थ्याच्या वर्तनात झालेला बदल आणि त्याचे मित्राला रबर देतानाचे उत्तर थक्क करणारे आहे. शालेय एकांकिकेसाठी मुलांची तयारी करून घेणे, त्यांना भूमिका देणे आणि त्यातून भन्नाट पात्र उभी करणे, त्यामध्ये सरांसमोरची अडचण सोडविण्यासाठी टक्कल करून अचानक अवतरलेला संदीप, दाजीपूरच्या ट्रेकमध्ये जेवणाची उद्भवलेली अडचण आणि अचानक झालेला भोजनलाभ आणि त्यानंतरचा भांडी घासण्याचा धडा, छत्रपती शिवाजी राजांच्या पेंटिंग दुरुस्तीसाठी आनंदाने पाच रुपये घ्या, म्हणणारी समा खान, पक्ष्यांचे घरटे सांभाळण्यासाठी मुन्सिपालिटीच्या लोकांना मेंदीचे झाड कापू न देणारा सागर, फटाके न वाजवता त्याच पैशातून वर्ग मित्रासाठी दिवाळीसाठी कपडे घेणारी मुलं, या सर्व कथांत मुलं मुलीच नायक नायिका आहेत आणि दिग्दर्शकही आहेत.
पुस्तकातील फक्त शेवटची गोष्ट आहे, खुद्द मिलींद सरांची. कथा आहे, हाती घेतलेल्या कामाप्रती निष्ठेची. काम सामाजिक असल्याने मिलींद सरांनी मुख्याध्यापकांना दिलेले सडेतोड पर्यायी उत्तर, त्यासाठी सोसलेल्या प्रचंड शारीरिक यातना आणि मानसिक त्रास. योग्य तर्काच्या दृष्टीने योग्य असलेले पण कोणी वेड्या माणसाने करावे असे केलेले धाडस आणि ‘लढाई जिंकलेल्या सैनिकाला दुखण्याचं फारसं काही वाटत नसतं’ असे त्यांचे सुभाषितवजा वाक्य, हे सारेच वाचताना मनाची घालमेल करणारे असे आहे. हे नाट्य घडल्यानंतर सरांनी उभा केलेल्या संसदेच्या सेटला प्रेक्षकांनी दिलेली उत्स्फूर्त दाद आणि त्यांना झालेला आनंद. हे सारं मिलींद सरांनीच करावं. कॉम्रेड, यू रिअली डिझर्व ग्रँड रेड सॅल्युट...
पुस्तकात खरं तर सर्व गोष्टी मूल्य शिक्षणाच्या, जीवन शिक्षणाच्या उत्तम वस्तुपाठ आहेत. धाडस, कष्ट, समजूतदारपणा, औदार्य, हजरजबाबीपणा, जातीपातीच्या पलीकडचे मैत्र, सर्वधर्मसमभाव, स्त्री पुरुष समानता अशा अनेक गोष्टींची, मूल्यांची, गुणांची अनुभवलेल्या गोष्टीतून केलेली सुरेख गुंफण, हे या कथांचे वैशिष्ट्य आहे.
सध्या लिहिताना हे पुस्तक हाच एक मुद्दा आहे. त्यामुळे मिलींद सरांबद्दल आणि आमच्या अवलिया मिलींदबद्दल लिहिणे उचित नाही. सुज्ञ पालक, संवेदनशील, उपक्रमशील शिक्षक, मुख्याध्यापक अशा सर्वांनीच हे पुस्तक वाचावे म्हणजे, आपले अध्यापन आणि मुलांचे शिक्षण अधिक समृद्ध होईल.
-oOo-
पुस्तकाचे नाव: कथा अंगाखांद्यावरच्या
लेखक: मिलींद यादव
प्रकाशक: विद्यार्थी समूह, शिवाजी मराठा हायस्कूल, कोल्हापूर
मूल्य: १६० रुपये मात्र
नोंदणीसाठी संपर्क: ९८५०८ ४७३८४
डॉ.बी.एम. हिर्डेकर
ईमेल:
Indexes Menu_Desktop
| सूची: |
| सूची: |
शनिवार, २६ जुलै, २०२५
गोष्टींचा अवलिया जोपासक
संबंधित लेखन
जुलै-२०२५
डॉ.बी.एम. हिर्डेकर
प्रस्तावना
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा