-
प्रस्तावना
आजीच्या सहवासातून फुलत गेलेल्या नातवाचे भावविश्व रेखाटणारे ज्येष्ठ पत्रकार, लेखक विकास महाडिकही गोष्ट एका आजीची आहे. तिच्या सोबतीने फुलत गेलेल्या नातवाच्या भावविश्वाचीही आहे. खरे तर ही एक गोष्ट नाही, तर अनेक गोष्टींची मिळून बनलेली ही फूलमाळ आहे. या गोष्टींना स्मरणरंजनाचा, मातीचा आणि मातीशी जैविक नाते सांगणाऱ्या पारदर्शी माणसांचा गंध आहे. त्यांचे राग, त्यांचे लोभ, त्यांच्या आशा, त्यांच्या आकांक्षा वाचकाला गुंतवून टाकणाऱ्या आहेत. एका पातळीवर या बोधकथाही आहेत आणि आठवणपर शब्दचित्रेसुद्धा. पार्श्वसंगीतासह ऐकता-पाहता याव्यात इतक्या या कथा जीवंत नि ठसठशीत उतरल्या आहेत. ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ पत्रकार विकास महाडिक हे या ‘एका आजीची गोष्ट’चे लेखक आहेत. लहान-थोरांना भुरळ घालू पाहणाऱ्या या गोष्टरुपी आत्मकथनाला ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची छोटेखानी प्रस्तावना लाभली आहे. त्याचेच हे पुनर्मुद्रण...देखण्या निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणाच्या पदरात जिव्हाळा, रसाळवाणी आणि व्यक्त होण्याची असोशी याचे दान पडलेले आहे. धनसंपत्ती, श्रीमंती आणि वित्त वैभवाचा अभाव असलेला कोकण निसर्ग श्रीमंतीने आणि माणसांच्या आस्थेने मालामाल राहिला आहे आणि हे प्रेमाचे, माणुसकीचे माप कोकणी माणसाने आपल्या काळजाशी आतल्या कोयीसारखे जपले आहे.
मुंबईसारख्या शहरात येऊन इकडच्या अनेक माणसांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. मात्र ते कधीही पूर्णपणे मुंबईचे होऊ शकत नाहीत, कारण त्यांच्या गावची माती त्यांना सतत साद घालत असते आणि दुरूनही आपल्या कुशीत घेत असते.
लेखक विकास महाडिक यांनी सांगितलेल्या गोष्टी या आजीच्या गोष्टी राहतच नाहीत, त्या सहजपणे बोधकथा होऊन मनाची पकड घेतात…छत्रपती शिवाजी महाराजांचे वतन लाभलेले महाडिक राजे यांचे वंशज असलेली अनेक महाडिक कुटुंबे चिपळूण, गुहागर या भागात आहेत. मुंबईत पत्रकार म्हणून नाव मिळवलेले विकास महाडिक याच महाडिकांच्या वंशजांपैकीच. मुंबईत राहणाऱ्या आईवडिलांना सोडून ते काही काळ गावी गेले आणि आपल्या आजीसोबत राहिले, मोठे झाले. कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात आजीसोबत घालवलेल्या त्या बालपणातील आठवणींचा अल्बम म्हणजे ‘एका आजीची गोष्ट’ हे पुस्तक आहे. स्वतःच्या प्रगतीचा आलेख मांडणारं आणि सोबत आपली नाळ ज्या मातीत पुरली गेली आहे, त्या गावाचा, त्या भागाचा ललित शैलीत लेखाजोखा घेणारं मराठीतलं आजीच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणारं असं हे पहिलंच पुस्तक असावं. स्वतःचं कष्टमय जीवन आणि कोकणातल्या व्यवहारांची माहिती देणारे, गत आयुष्याचा मागोवा घेणारं हे लेखन मला खूपच रंजक वाटलं.
खरं सांगायचं, तर माझ्याच ‘करुळचा मुलगा’ या आत्मचरित्राची मला आठवण झाली. माझे बालपणीचे हालातले दिवस असेच गेले. ते आठवले. बालपणीच्या हालअपेष्टांच्या आठवणींना बहुधा लेखन हा एकमेव उःशाप आहे असे वाटते. कारण त्या हालअपेष्टांचा त्रास या लेखनाने कमी करता येतो. एका अर्थाने, अशा आठवणींचे लिखाण म्हणजे बालपणीचे ऋण फेडणे असते.
विकास महाडिक यांनी आपल्या चरित्रातून ते ऋण फेडले आहे आणि कोकणातील लेखकांच्या मांदियाळीत आपलेही नाव जोडले आहे.
कोकणची माती ही तशी सुपीक, पण पिके घ्यायला अवघड. इथल्या माणसांचेही तसेच आहे. दिसायला राकट, वागायला कडक, पण आतून नारळाफणसासारखे रसाळ, प्रेमळ. कोकणातल्या अशाच एका जिद्दी आजी नातवाची ही गोष्ट. दिसायला देखणी, प्रेमळ पण निश्चयाची ठाम अशी एक आजी आपल्या नातवाला मुंबईतून गावाला घेऊन जाते, स्वतःकडे ठेवून घेते, वाढवते, मोठे करते, त्याच्यावर निश्चयाचे, आपल्या ध्येयाप्रती ठाम राहण्याचे संस्कार करते आणि नातवाला एक उत्तम माणूस, उमदा पत्रकार बनवते, त्याची ही कहाणी.
संस्कारक्षम मन स्वातंत्र्याची, मनमोकळ्या अवकाशाची मागणी करत असते. जिथे त्याला हे सारे मिळते, तिथेच कोणताही महागडा क्लास न लावता त्याचे व्यक्तिमत्व फुलण्याची प्रक्रिया सुरु झालेली असते...चिपळूण - गुहागर भागातील चिवेली गावच्या एका आजीने जिद्दीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नातवाला वाढवले. आलेल्या एकेक वादळाला सहज सामोरे जात मोठे केले. त्याचे लालित्यपूर्ण चित्रण म्हणजे हे आत्मकथन...
तसे आजी-नातवाचे नातेच वेगळे असते. जसे दुधाहून दुधावरच्या सायीला जपतात तशी आजी मुलाला नव्हे, तर नातवाला जपते. अनेकांच्या आकांक्षाना आणि प्रतिभाविश्वाला ऊर्जा देणारे, त्याचे वा तिचे आई वा वडील नसतात तर अशा प्रेमळ आज्याच असतात, हे जीवशास्त्रीय सत्यही हे पुस्तक सांगते. मुंबईत पत्रकार म्हणून नाव मिळवलेले विकास महाडिक लहानपणी हट्टाने आजीचा पदर धरून गावी गेले आणि काहीच सोयीसुविधा नसलेल्या गावात निश्चयी करारी आजीच्या आधाराने काही वर्ष राहिले. उमदा माणूस झाले, याचं अत्यंत तपशिलाने केलेलं विवेचन म्हणजे महाडिकांचे हे छोटेखानी आत्मचरित्र, कोकणातल्या अशा कैक काटक, खमक्या आणि प्रेमळ आज्यांचे चित्र उभे करणारे आणि आपल्या आजीलाच लेखनाचा केंद्रबिंदू बनवलेले माझ्या वाचनात आलेले हे पहिलेच आत्मकथन, तेही माझ्या लाडक्या कोकणच्या पार्श्वभूमीवरचे. आपल्या अभावग्रस्त आयुष्याला आजी हेच कणखर उत्तर लाभले, हे एका पत्रकाराने आजीच्या लुसलुशीत स्पर्शाच्या ममतेने विशद करून सांगितले आहे...
अशा या व्रतस्थ आजीच्या भाम्यवान पत्रकार नातवाचं मी कौतुक करतो आणि यापुढेही त्यांच्याकडून कोकणचे अंतरंग उलगडणारे असे मनस्वी लेखन व्हावे यासाठी आशीर्वाद देतो.
-oOo-
पुस्तकाचे नाव : एका आजीची गोष्ट
लेखक : विकास महाडिक
प्रकाशक : संगणक प्रकाशन
मुखपृष्ठ व रेखाचित्रे : अनिल विठ्ठल डावरे आणि आदित्य चारी
संपादन साहाय्य : प्रशांत मोरे
मूल्य : २५० रुपये
मधु मंगेश कर्णिक
ईमेल: .
Indexes Menu_Desktop
| सूची: |
| सूची: |
रविवार, २७ जुलै, २०२५
आजीला केंद्रबिंदू ठेवून केलेले मनस्वी लेखन
संबंधित लेखन
जुलै-२०२५
प्रस्तावना
मधु मंगेश कर्णिक
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा