-
नास्तिक दर्शन
एकूण नऊ दर्शने प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानातील विविध वैचारिक शाखांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामध्ये वास्तविकता, ज्ञान, धर्म, नैतिकता आणि मुक्ती या विषयांवर विविध दृष्टिकोनांनी विस्तृतपणे विवेचन केलेले दिसते. या महर्षींना प्रत्येक दर्शनाचे सूत्रकर्ते म्हणतात. कारण त्यांनी त्या त्या दर्शनिक तत्त्वज्ञानाचे मूलभूत सिद्धांत सूत्रबद्ध केले. याचा अर्थ, या दर्शनांमधील विचार या ऋषींच्या आधीही अनेक वर्षे अस्तित्वात होतेच. त्या विचारांना संकलित करून एकत्रितपणे सूत्रबद्ध करून त्या ऋषींनी त्यांची मांडणी केली म्हणून, त्यांना त्या त्या दर्शनाचे सूत्रकर्ते संबोधले जाते. ही दर्शने भारतीय तत्त्वज्ञानाचा मूलभूत पाया आहेत...प्राचीन भारतीय नऊ दर्शने
भारतीय दर्शनशास्त्रात एकूण नऊ दर्शने आहेत, ज्यांना नवदर्शने असेही म्हणतात. ही नऊ दर्शने आणि त्यांचे सूत्रकर्ते ऋषी खालीलप्रमाणे आहेतः
१. न्यायदर्शन (न्यायशास्त्र) - महर्षी गौतम, २. वैशेषिकदर्शन (वैशेषिकशास्त्र) - महर्षी कणाद, ३. सांख्यदर्शन (सांख्यशास्त्र) - महर्षी कपिल, ४. योगदर्शन (योगशास्त्र) - महर्षी पतंजलि, ५. मीमांसादर्शन (मीमांसाशास्त्र) – महर्षी जैमिनि, ६. वेदांतदर्शन (वेदांतशास्त्र) - महर्षी व्यास (बादरायण), ७. चर्वाकदर्शन (चर्वाकशास्त्र) - महर्षी बृहस्पती, ८. बौद्धदर्शन (बौद्ध मतशास्त्र) - गौतम बुद्ध आणि ९. जैनदर्शन (जैन मतशास्त्र) - आदिनाथ आणि महावीर.
ही नऊ दर्शने प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानातील विविध वैचारिक शाखांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामध्ये वास्तविकता, ज्ञान, धर्म, नैतिकता आणि मुक्ती या विषयांवर विविध दृष्टिकोनांनी विस्तृतपणे विवेचन केलेले दिसते. या महर्षीना प्रत्येक दर्शनाचे सूत्रकर्ते म्हणतात. कारण त्यांनी त्या त्या दर्शनिक तत्त्वज्ञानाचे मूलभूत सिद्धांत सूत्रबद्ध केले. याचा अर्थ, या दर्शनांमधील विचार या ऋषींच्या आधीही अनेक वर्षे अस्तित्वात होतेच. त्या विचारांना संकलित करून एकत्रितपणे सूत्रबद्ध करून त्या ऋषींनी त्यांची मांडणी केली म्हणून त्यांना त्या त्या दर्शनाचे सूत्रकर्ते संबोधले जाते. ही दर्शने भारतीय तत्त्वज्ञानाचा मूलभूत पाया आहेत.
प्रत्येकाचे स्वतःचे विचार, तत्त्वे आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. आस्तिक दर्शने ही वेदांना प्रमाण मानतात आणि ईश्वर, आत्मा, कर्म, पुनर्जन्म यावर विश्वास ठेवतात. यात सहा दर्शने समाविष्ट आहेत, ज्यांना षड्दर्शने म्हणतात. ती न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा (वेदांत) या नावाने ओळखली जातात. नास्तिक दर्शने ही वेदांना प्रमाण मानत नाहीत आणि ईश्वराच्या अस्तित्वाला नाकारतात किंवा त्यावर प्रश्न उपस्थित करतात. यात तीन दर्शने येतात, ती अशी... चार्वाक, बौद्ध, जैन.
आस्तिक षड्दर्शने
सुरुवातीला आपण थोडक्यात आस्तिक षड्दर्शनांचा विचार करूया. या पार्श्वभूमीवर आपणास नास्तिकतेचा मागोवा घेणे सोपे जाईल.
(१) सांख्यदर्शन : हे दर्शन ‘विश्वनिर्मिती व विश्वविकासाचा’ निव्वळ ‘भौतिक दृष्टिकोनातून’ विचार करणारे व त्यासाठी ‘कुणा ईश्वराच्या अस्तित्वाची आवश्यकता नाही’ असे मानणारे व त्याअर्थी ‘नास्तिकदर्शन’ आहे. पण ईश्वर मानीत नसले तरी हे दर्शन वेदांना विरोध करीत नसल्यामुळे त्याची ‘आस्तिक’ अशी वर्गवारी केली गेली. मूळ निरीश्वरवादी सांख्यदर्शन आज उपलब्ध नाही. या विचारधारेची दर्शन स्वरूपात मांडणी कपिलमुनीने केलेली असून, नंतरच्या काळातील गीतेनेही (सांख्यमतात काही बदल करून पण) कपिलमुनींना फार मान दिलेला आहे.
(२) योगदर्शन : ‘सांख्य आणि योग’ या दोन सर्वात जुन्या विचारधारा असाव्यात आणि त्या वेदपूर्व सिंधू संस्कृतींतूनसुद्धा आल्या असण्याची शक्यता आहे. योगात असे मानतात, की मन स्थिर करून ध्यानधारणा केल्यास अनेक मनोशारीरिक रोगप्रतिकारक शक्तीच्या उपलब्धी प्राप्त होतात. योगाची दर्शन-स्वरूप आणि सूत्रमय रचना इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या पतंजली मुनीने केलेली आहे. पतंजलीच्या ‘योगश्चित्वृत्तीनिरोधः’ म्हणजे ‘योग हे चित्तवृत्तीचे नियमन होय’ या योगाच्या व्याख्येत ‘ईश्वर’ नाही. पण पतंजलीने मन केंद्रित करण्यासाठी एक ‘पर्याय’ म्हणून तरी ईश्वर सांगितलेला आहे. कुठल्याही कारणाने का असेना, पण ‘योगदर्शन ईश्वर मानते’ असे साधारणपणे मानले जाते. पुढील काळातील गीतेने तर योग हा ध्यानयोग या नावाने मोक्षप्राप्तीचा मार्ग सांगितला व त्याला ईश्वराबरोबर जोडून टाकले. जैन व बौद्ध हे ईश्वर न मानणारे याअर्थी नास्तिक धर्म असूनसुद्धा ते त्यांचे स्वतःचे योगशास्त्र मानतात.
(३) वैशेषिकदर्शन : कणादमुनीने असे सांगितले की जगाची निर्मिती परमाणूंपासून होते व त्यासाठी कुणा ईश्वराची आवश्यकता नाही. कणादमुनी हा चक्क एक वैज्ञानिक वाटतो आणि त्याचे हे दर्शन खरे तर नास्तिक दर्शन आहे. परंतु वेदांना न नाकारल्यामुळे त्याचीही गणना आस्तिक दर्शन अशी झाली.
(४) न्यायदर्शन : गौतममुनी या प्रणेत्याचे हे दर्शन वादविवादांसाठी वापरले जात असे म्हणून याला वादविद्या असेही म्हणतात. ‘न्याय’ म्हणजे ‘प्रमाण’ ठरवून तत्त्वाची परीक्षा करणे होय. हे दर्शन स्पष्टपणे सर्वज्ञ, सर्वव्यापक व सर्वशक्तिमान ‘ईश्वराचे’ अस्तित्व मानणारे दर्शन आहे. पण हे दर्शन ईश्वराला सृष्टीचे ‘घटकद्रव्यकारण’ असे मानीत नसून, ते त्याला ‘निमित्तकारण’ असे मानते.
आस्तिक दर्शनाचा गाभा ईश्वरीतत्त्वाची चर्चा करणारा आहे. मात्र यात ईश्वर आणि सृष्टी यात अद्वैत मानले गेले आहे, तरीही रुढी-परंपरांचा पगडा इतका जबरदस्त राहिला आहे, की ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी कर्मकांडांना उत्तरोत्तर मान्यता मिळत गेली आहे...(५) मीमांसा किंवा पूर्वमीमांसा : जैमिनी ऋषीच्या या दर्शनाला ‘जैमिनीसूत्रे’ असेही म्हणतात. हे दर्शन यज्ञ, आत्मा, वेदप्रामाण्य वगैरे सर्व मानते व हे मुख्यत्वे वैदिक यज्ञांच्या कर्मकांडाशीच संबंधित दर्शन आहे. पण यांच्या मते, यज्ञाच्या कर्मफळाचा दाता स्वतः यज्ञ आहे, ईश्वर नव्हे. याअर्थी खरे तर हे दर्शन ‘नास्तिक’ आहे. पण वेद व यज्ञ यांना मानणारे म्हणून हे दर्शन आस्तिक, प्रतिष्ठित गणले गेले.
(६) उपनिषदे, वेदांत दर्शन किंवा उत्तरमीमांसा हे दर्शन हिंदूंच्या षड्दर्शनांपैकी सर्वात प्रसिद्ध, प्रमुख व जवळजवळ सर्वमान्य असे दर्शन आहे. याच्यानुसार ईश्वर आणि सृष्टी या दोन वेगवेगळ्या वस्तू नसून, म्हणजे त्या दोघांत ‘द्वैत’ नसून ‘अद्वैत’ आहे. म्हणजे संपूर्ण सृष्टी व त्यातील सर्व सजीव ईश्वरमय आहेत. आत्मा व परमात्मा एकच आहेत, असे संपूर्ण अद्वैत मानणारा हिंदू हा जगातील एकमेव धर्म आहे. प्रमुख उपनिषदांनंतर काही शतकांनी ‘ब्रह्मसूत्रे’ हा त्यांच्यावरील प्रमाण ग्रंथ बादरायणाचार्यानी रचला. त्यांनी नास्तिक मताला विरोध करून ईश्वरवादाचे म्हणजे ब्रह्मवादाचे समर्थन केले. पुढे हे औपनिषदिक तत्त्वज्ञानच हिंदू धर्माचे मुख्य तत्त्वज्ञान बनले.
याशिवाय भारतीय तत्त्वज्ञानाने चार्वाक दर्शन, बौद्ध दर्शन आणि जैन दर्शन या ३ नास्तिक दर्शनांनाही तितक्याच आदराने स्वीकारले आहे.
(७) जैनदर्शन व (८) बौद्धदर्शनः आजपासून सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी इ.स.पूर्वच्या सहाव्या शतकात होऊन गेलेल्या महावीर यांना जैन धर्माचा व गौतम बुद्ध यांना बौद्ध धर्माचा संस्थापक मानण्यात येते. हे दोघेही क्षत्रिय वर्णाचे मगध प्रांतीय म्हणजे, आजच्या बिहार राज्यातील वेगवेगळ्या राजघराण्यांत जन्मलेले समकालीन होते. त्यातील गौतम बुद्ध तर ब्राह्मणांहून क्षत्रिय श्रेष्ठ आहेत असे मानणारा होता. पण कुठलेही जातिभेद, वर्णभेद पाळू नका, असे त्याने सांगितले. हे दोन्ही धर्म हिंदू धर्मातील ‘ईश्वर’ किंवा ‘ब्रह्म’ ही संकल्पना मानीत नाहीत; आणि ते कुणा देवांच्या मूर्तीही बनवीत नाहीत. मात्र जैन धर्मीय त्यांच्या तीर्थंकरांना ‘मार्गदर्शक’ मानून त्यांच्या मूर्ती बनवितात. काही बौद्ध देशांमध्ये बुद्धाच्या (आदिबुद्धाच्या) मूर्ती बनवून त्याला ईश्वर म्हणून पूजतात. शिवाय हे दोन्ही धर्म अहिंसक आहेत. महावीराने तर अहिंसा हाच परमोधर्म असे सांगितले आहे. जैन धर्मात, वैदिक धर्मातील पशुहिंसेमुळे वेदांना चक्क ‘हिंसक श्रुती’ असे म्हणतात. त्याचप्रमाणे जैन व बौद्ध या दोन्ही धर्माना वर्णभेद व जातिभेद मान्य नाहीत.
वेद-वर्णविरोधी फुटीर शाखा
जैन व बौद्ध हे दोन्ही वेगवेगळे धर्म मानले जात असूनही ते हिंदू धर्माच्याच यज्ञविरोधी, वेदविरोधी, वर्णभेदविरोधी अशा फुटीर शाखा आहेत, असेही म्हणता येते. कारण जैन व बौद्ध हे दोन्ही धर्म मूलतः उपनिषदांप्रमाणे निवृत्तीवादी (संन्यासमार्गी) धर्म आहेत. या दोन्ही धर्मांनी आचारविचारांचा मोठा वारसा, वैदिक धर्माकडून घेतलेला आहे. उदाहरणार्थ, योगविद्या पण स्वतःची वेगळी परिभाषा निर्माण करून त्याचप्रमाणे पुढील काळात हिंदूंच्या पौराणिक कथा त्यात त्यांच्या धर्माला अनुकूल असे बदल करून त्यांनी उचलल्या. जैन धर्मीयांनी तर हिंदूंचे अनेक संस्कार व मूर्तिपूजा स्वीकारून आजही भारतात (आपले वेगळेपण काहीसे टिकवून) ते हिंदू धर्मीयांशी समरस होऊन सुखाने राहाताहेत. जैन धर्मात असे मानतात की, ऋषभदेव या त्यांच्या पहिल्या तीर्थंकरापासून सुरू होऊन, पार्श्वनाथ हा त्यांचा तेविसावा तीर्थंकर व महावीर हा त्यांचा चोविसावा तीर्थंकर आहे. त्यांच्यापैकी पार्श्वनाथापूर्वीचे बावीस जण ऐतिहासिक नसून काल्पनिक असावेत, असे त्यांच्या वयाच्या (लाखो वर्षे) व शारीरिक उंचीच्या पौराणिक वर्णनांवरून वाटते. पार्श्वनाथ हा तेविसावा तीर्थंकर मात्र इ.स.पू. ८००च्या सुमारास होऊन गेला असावा. सत्य, अहिंसा, अस्तेय (चोरी न करणे) व अपरिग्रह (साठा न करणे) अशा चार यमनियमांचा ‘चातुर्याम धर्म’ पार्श्वनाथाने श्रमणांसाठी म्हणजे मुमुक्षूसाठी सांगितला होता. या धर्मातच ‘ब्रह्मचर्य’ या पाचव्या यामाची भर घालून तो महावीराचा पंचमहाव्रतांचा जैन धर्म बनला.
बुद्धाने वैदिकांचे शब्दप्रामाण्य, कर्मकांड व ईश्वरप्रामाण्य साफ नाकारले. त्याला दुःखी व पीडित लोकांना दुःखमुक्त होण्याचा नवीन मार्ग दाखवायचा होता. बुद्धाची चार थोर सत्ये अशी होती...
(य) जग दुःखमय आहे.
(र) दुःखाचे कारण तृष्णा हे आहे.
(ल) तृष्णेच्या त्यागाने दुःखनाश होईल.
(व) निर्वाणप्राप्तीसाठी अष्टांगिका मार्ग अवलंबावा.
वैचारिक मन्वंतराचे पर्व
मूलतः जैन व बौद्ध हे दोन्ही धर्म निरीश्वरवादी आहेत. मात्र जैन धर्मात जीवात्मा या अर्थी आत्म्याचे अस्तित्व व पुनर्जन्मही मानतात. स्वतः गौतम बुद्ध मात्र अमर आत्म्याचे अस्तित्वसुद्धा न मानणारा होता. ‘सतत बदलणाऱ्या या जगात स्वतःला प्रश्न विचारून, चौकशी करून, बुद्धीला जे पटेल तेच स्वीकारा,’ असे बुद्धिप्रामाण्यवादी मार्गदर्शन करणारा गौतम हा जगातील एकमेव धर्मसंस्थापक होय.
वैदिक कर्मकांडाला व हिंसक यज्ञांना लोक आधीच कंटाळलेले असताना व उपनिषदांनीसुद्धा यज्ञविरोधी आवाज उठविलेला असताना आणि अनेक राजे व त्यांची सैन्ये एकमेकांशी भिडून महाभारत युद्धात प्रचंड मनुष्यहानी झाल्यामुळे, हिंसेबद्दल एक प्रकारचा उबग लोकांच्या मनात निर्माण झालेला असतानाच जैन व बौद्ध हे सत्य, अहिंसा, शांती अशा थोर मूल्यांवर आधारित धर्म लोकांसमोर आल्यामुळे एक वैचारिक मन्वंतर घडून आले. ‘न दिसणाऱ्या ईश्वरामागे धावण्यापेक्षा सदाचार व सद्भावना राखून सर्वानी सुखी व्हा’, असे आवाहन त्यांनी केले. लोकाश्रय व राजाश्रय मिळवून या दोन्ही धर्माचा तत्कालीन भारतात वेगाने प्रसार झाला.
एका बाजूला कर्मकांडे, ती पार पाडणारे वर्ग आणि दुसऱ्या बाजूला न दिसणाऱ्या ईश्वरापाठी धावण्यापेक्षा सदाचार, सद्भावना बाळगा म्हणणारा बुद्धिप्रामाण्यवाद या दोन प्रवाहांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया विस्तारला आहे...प्रत्यक्ष हेच प्रमाण
(९) चार्वाकदर्शनः चार्वाक हे एक प्राचीन भारतीय भौतिकवादी आणि नास्तिक दर्शन होते. चार्वाक हा कोण होता, त्याचा काळ कोणता, त्याचा ग्रंथ कोणता, याचा नीटसा उलगडा होत नाही. चार्वाक हे नाव चारु (गोड) आणि वाक् (वाणी) या शब्दांच्या संधीपासून तयार झाले आहे असे मानले जाते. या अर्थाने चार्वाक म्हणजे गोड बोलणारे लोक होत. चार्वाक तत्त्वज्ञान हे सर्व निर्मूलवादी, पण जीवनातील प्रत्यक्ष अनुभवाशी नाते सांगणारे आहे. ‘चार्वाक दर्शन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नास्तिक मताची प्रवर्तक असलेली, कोणी एक चार्वाक नावाची व्यक्ती असावी, असा एक समज आहे. ही विचारपरंपरा वेदांइतकीच प्राचीन आहे. तिचे खरे नाव लोकायतिक / ‘लोकायत’ किंवा ‘बार्हस्पत्य मत’ (बृहस्पतिप्रणीत विचार) असे आहे. त्याची परंपरा शंकर... पुरंदर... बृहस्पती... अशी धरली जाते.
या दर्शनात प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे. या शब्दात, प्रति आणि अक्ष अशी दोन पदे आहेत. अक्ष म्हणजे इंद्रिय; त्यामुळे प्रत्यक्ष म्हणजे जे इंद्रियांना अनुभवता येते ते. शब्द आणि अनुमान याला मर्यादा आहेत. यामुळे आत्मा, ईश्वर आणि स्वर्ग या गोष्टींना या तत्त्वज्ञानात स्थान नाही. चार्वाक मताप्रमाणे, जे ज्ञान इंद्रियांच्या द्वारे बुद्धीला होते तेच खरे आहे, असे समजले जाते. चैतन्य हे पृथ्वी, आप, तेज, वायू या जडापासूनच निर्माण होते. चैतन्याला वेगळे अस्तित्व नाही आणि देह नष्ट झाला की ते नष्ट होते. चार्वाक तत्त्वज्ञान जडवादी असल्याने ही दृश्य सृष्टी केवळ जड द्रव्यांची परिणति आहे, असे ठाम मत या दर्शनाने मांडले. ‘भूतेभ्यः चैतन्यम्!’ हा त्याचा मुख्य सिद्धांत आहे. हे जड पदार्थ परस्परांच्या संपर्कात येतात आणि आकार धारण करतात आणि हे विश्व साकारते. ते घटक विशिष्ट प्रमाणात एकत्र येतात आणि निरनिराळे देह उत्पन्न होतात व त्यात चैतन्य स्वयं उत्पन्न होते. अंतर्भूत घटकांचे प्रमाण बिघडले की, देह किंवा आकार नष्ट होतात, चैतन्यही नाश पावते. हाच मृत्यू, चैतन्य किंवा आत्मा जडाहून वेगळा नाही. तो देहात येतो, देहातून जातो, ही कल्पना वेडगळपणाची आहे, असे स्पष्ट मत या दर्शनात आढळते.
या दर्शनात अर्थ आणि काम हेच पुरुषार्थ म्हटले आहेत. धर्म आणि मोक्ष या संकल्पना खऱ्या नाहीत. सुखी होण्यासाठी माणसाने उद्योग करावेत, अर्थप्राप्ती करून घ्यावी. शहाण्यांनी या जगात शेती, गोपालन, व्यापार, प्रशासन सेवा इत्यादी कामे करून मिळालेल्या द्रव्याच्या साह्याने सुखोपभोग घ्यावेत, हाच लोकायतांचा आदर्श आहे.
पंचज्ञानेंद्रियांनी ज्याचा अनुभव घेता येतो, तेवढेच खरे. म्हणून आकाश हे महाभूत ते मानत नाहीत. लोकायत तत्त्वज्ञानानुसार महाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू ही चार तत्त्वे; यांच्या संयोगांस शरीर, इंद्रिय अशा संज्ञा आहेत, त्यातून चैतन्याची निर्मिती होते. चेतनायुक्त शरीर म्हणजेच पुरुष. प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे. अनुमान प्रमाण नाही. त्यामुळे परलोक अस्तित्वात नाही, आत्मा नाही, त्यामुळे अर्थात पुनर्जन्म नाही. श्राद्ध, पक्ष इत्यादी पितरांसाठी करावयाचे विधी त्यांना पटत नाहीत. आत्मा मानणे म्हणजे जे दिसते ते शरीर नाही आणि जे दिसत नाही तो आत्मा आहे, असे म्हणणे. यालाच ते भ्रमिष्टपणा म्हणतात. ते परलोक मानत नसल्याने, कर्मविपाकसिद्धांतावरही त्यांचा विश्वास नाही. या जन्मी जे करायचे ते करून घ्यावे, पुढचा जन्म वगैरे नसतो, हे त्यांचे मत आहे. असे हे लोकायतिक म्हणजेच ईहवादी तत्त्वज्ञान आहे.
ही नऊ दर्शने भारतीय तत्त्वज्ञानाचा समृद्ध वारसा आहेत. प्रत्येक दर्शन जीवन, विश्व आणि सत्य यांचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करते. आस्तिक दर्शने वेदांवर आधारित आहेत तर, नास्तिक दर्शने स्वतंत्र तर्क आणि अनुभवावर जोर देतात. यांनी भारतीय संस्कृती, धर्म, नीतिमत्ता आणि विज्ञानाला प्रभावित केले आहे. आजही कमी अधिक फरकाने आपण या नऊ दर्शनाच्या आधारेच आपले सांस्कृतिक जीवन जगत आहोत.
-oOo-
जगदीश काबरेजगदीश काबरे हे विज्ञानप्रसार आणि सामाजिक उन्नयनाशी निगडित कार्यकर्ते, ज्येष्ठ लेखक आणि आस्वादक आहेत.
ईमेल: jetjagdish@gmail.com.
Indexes Menu_Desktop
| सूची: |
| सूची: |
रविवार, १७ ऑगस्ट, २०२५
भारतीय तत्त्वज्ञानाच्या अंतरंगात...
संबंधित लेखन
ऑगस्ट-२०२५
जगदीश काबरे
नास्तिक दर्शन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा