Indexes Menu_Desktop

सूची:
सूची:
सुमती जोशी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सुमती जोशी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५

कथा: अपराधी कोण?

  • अनुनाद

    AparadhiHeadImage

    दरवाजा उघडल्यावर अमरनाथ अवाक झाले. शिपाई नाही, कुरिअर सर्व्हिसेसचा माणूस नाही, ढगळ खाकी शर्ट आणि कंबरेला लाल पट्टा बांधलेला एकजण पत्र हातात घेऊन उभा होता.

    तो माणूस म्हणाला, “कोर्टाचं समन्स आहे, सही करून घ्या.” हे ऐकल्यावर अमरनाथ घाबरून गेले. समन्स? अमरनाथ जीवनात कधीही कोर्टात गेले नव्हते. पोलीस चौकी, हवालदार यांच्याशीही त्यांचा कधीही संपर्क आला नव्हता. नक्कीच काहीतरी चूक होत असली पाहिजे.

    तो माणूस विचारू लागला, “जयदीप सरकार, आपणच ना?” अमरनाथ म्हणाले, “नाही. म्हणजे माझा मुलगा.”

    तो माणूस म्हणाला, “ते घरात आहेत का? आपणही घेऊ शकता आणि जर घ्यायचं नसलं तर मी हे परत घेऊन जाईन. मग पोलीस येतील.”

    अमरनाथनी सही करून तो कागद घेतला. पत्ता बरोबर घातला होता, त्यांच्या मुलाचं नावही त्यावर लिहिलेलं होतं. परंतु जयदीपला कोर्टाकडून कशासाठी बोलावलं असेल?


    अमल दासगुप्त नावाच्या एका माणसाने हाय कोर्टात तीन लाख रुपयांचा स्कॅम झालाय म्हणून खटला भरला होता. तीन आरोपींच्यात जयदीपचा समावेश होता.

    अमरनाथ यांच्या छातीत धडधडू लागलं. जयदीपने कोणाला तरी सामील होऊन पैशांची अफरातफर केली होती? तेही तीन लाख रुपये? अशक्य! खोटं आहे हे!

    परंतु समन्स खोटं असणार नाही!


    दोन अपत्य. मोठ्या मुलीचा विवाह झाला होता. ती जमशेटपूरला राहत असे. जयदीप यादवपूर विश्वविद्यालयात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. अजून एक वर्ष शिल्लक होतं. अभ्यासात हुशार, सरळमार्गी, चांगला मुलगा. आईबाबांना अभिमान वाटावा, असा मुलगा.

    जयदीप उत्तम बॅडमिंटनपटू होता. आजवर त्याने अनेक ट्रॉफी मिळवल्या होत्या. एका स्पर्धेसाठी तो भुवनेश्वरी येथे गेला होता, त्या दिवशी संध्याकाळी परत येणार होता.

    आत्ता घरात फक्त नवरा-बायको. अमरनाथ पुनःपुन्हा समन्स वाचू लागले. स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता त्यांचा!

    इंदिरेची ही वर्तमानपत्रं वाचायची वेळ. सकाळच्या वेळी ती घरकामात इतकी व्यग्र असे की वर्तमानपत्रं बघायलासुद्धा तिला सवड होत नसे. दुपारी जेवणं झाल्यावर ती दोन वर्तमानपत्रं घेऊन बसत असे.

    हे समन्स पत्नीला दाखवावं की दाखवू नये, हे अमरनाथना समजेना. मुलगा म्हणजे जीव की प्राण! अचानक असं काही ऐकलं, तर तिला धक्काच बसेल! शुद्ध हरपून अर्धांगाचा झटका आला तर…? अशा गोष्टी अनेकदा कानावर येत असत.

    केव्हातरी सांगावं लागणारच! जयदीप परत आला की त्याला हे समन्स दाखवावं लागेल. कोर्टाकडून आलेलं समन्स नाकारता येणार नाही.

    इंदिरेनी आतल्या खोलीतून विचारलं, “कोण आलं होतं?”

    अमरनाथ हळूहळू पावलं टाकत त्या खोलीत गेले. त्यांचा चेहरा पांढराफटक पडला होता. अस्फुट आवाजात ते म्हणाले, “काहीतरी चमत्कारिक घडलंय. मला त्याचा अर्थ लावता येत नाहीय.”

    यजमानांची स्थिती बघितल्यावर काळजी वाटून इंदिरा उठल्या आणि तो कागद पाहू लागल्या. भुवया उंचावत आठ्या घालत त्या विचारू लागल्या, “हे आहे काय?”

    अमरनाथ म्हणाले, “कोर्टाचं समन्स.”

    “ते तर दिसतंच आहे, पण खोकेनच्या नावाने का आलाय?”

    “ते मलाही ठाऊक नाही.”

    “नक्कीच काहीतरी चूक झालीय.”

    “आपल्याच घराचा पत्ता यावर लिहिलाय.”

    “असेना, का; पण खोकेन असलं घाणेरडं काम करू शकेल का?”

    “माझ्याही मनात तोच विचार येतोय. पण...”

    “तुम्ही हे परत का पाठवलं नाही?”

    “परत पाठवलं असतं तर आपल्याकडे पोलीस आले असते.”

    “इथे आणखी दोघांची नावं लिहिलेली आहेत, त्यांनाही आपण ओळखत नाही ना? खोकेनच्या सगळ्या मित्रांशी आपली ओळख आहे.”

    “आपण ज्यांना ओळखतो, ते सोडून आणखीही...”

    “त्याला इतर फारसे मित्र नाहीत आणि हा अमर दासगुप्ता कोण आहे? त्याचं नावही कधी ऐकलं नाही.”

    “मलाही माहीत नाही. खोकेन अधूनमधून बऱ्याच उशिरा घरी परततो. नऊ-साडेनऊ होऊन जातात. कुठे असतो, त्याविषयी तो काही बोलत नाही.”

    “खेळायला जातो. आणखी कुठे जाणार?”

    “पावसाळ्यात खेळ असतो का?”

    “मित्रांबरोबर असतो. गप्पांचा अड्डा. खोकेन आता मोठा झालाय. सारा वेळ आईबाबांबरोबर कसा राहील तो? तुमच्या या वयात तुम्ही घरात राहत होतात का हो?”

    “कधी कधी तो उदास दिसतो. स्वतःच्या खोलीत गुपचूप बसून राहतो. मी काही विचारलं तर उत्तर देत नाही.”

    “कोणाच्या प्रेमात पडला असेल कदाचित!”

    “इंदू माझ्या मनात एक शंका येतेय, सांगू का तुला? तो कोणाच्या तरी सांगण्याच्या भरीस पडून कोणाबरोबर व्यवसाय करायला गेला नसेल ना? इतके पैसे!”

    “व्यवसाय करणार? आपला खोकेन? अजून शिक्षण पूर्ण व्हायचंय. तुमचं डोकं फिरलंय का? व्यवसाय करायचा विचार तो कशाला करेल? जे काही पैसे लागतात, ते तुमच्याकडून मागून घेतो ना तो? तुम्ही पैसे द्यायला नकार दिलाय, असं कधी झालंय का?”

    “कधीच झालं नाही. तो वायफळ खर्च करत नाही.”

    “मग?”

    “जर कोणाच्या वाईट संगतीत अडकून पडला असला तर...? कोणीतरी सहज पैसे मिळवायचं आमिष दाखवून त्याला वाईट कामात सहभागी करून घेतलं असलं तर...?”

    “माझ्या रक्तामांसाच्या मुलाला मी ओळणार नाही का?”

    SagarShindeSketch2
    रेखाचित्रे : सागर शिंदे.

    जयदीप संध्याकाळी सहाच्या सुमारास घरी परतला.

    आल्या आल्या त्याला काही सांगितलं नाही. आधी त्याचं खाणंपिणं होऊ दे. स्नान उरकून घेऊ दे. तरी अमरनाथ त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी पुसून टाकू शकले नाहीत.

    अंघोळ झाल्यावर जयदीप बाहेर पडला, परत आला रात्री नवाच्या सुमारास.

    जेवणाच्या टेबलापाशी बसून अमरनाथ हळू हळू सूतोवाच करू लागले. जयदीपने समन्स पाहिलं. त्याने त्याला काहीच महत्त्व दिलं नाही. कपाळाला आठ्या घालत फक्त म्हणाला, “कोणीतरी बहुतेक माझी थट्टा करताय. तीन लाख रुपये? जीवनात दहा हजारांपेक्षा अधिक रक्कम आजवर डोळ्याने पहिली नाही.”

    अमरनाथनी सावध होत विचारलं, “हा अमल दासगुप्त तुझा मित्र आहे का?”

    जयदीप म्हणाला, “मित्र! आयुष्यभरात मी हे नावही ऐकलं नाहीय.”

    इंदिरा म्हणाली, “मी तर केव्हाच सांगून टाकलंय, हे चुकीने आपल्याकडे आलंय किंवा कोणीतरी आपली थट्टा करतंय.”

    जयदीप ते समन्स फाडायला निघाला होता, पण अमरनाथ थांब, थांब म्हणत घाईघाईने त्याच्यापाशी गेले.

    ते म्हणाले, “कोर्टाचं समन्स फडता येणार नाही. उद्या तुला कोर्टात हजेरी लावावीच लागेल.”

    जयदीप स्वभाविक होत म्हणाला, “ठीक आहे. जाईन.”

    अमरनाथ म्हणू लागले, “एक वकील ठरवायला हवा ना?”

    “वकील कशासाठी? फॉल्स केस, त्यासाठी वकिलावर मी खर्च कशाला करू?”

    “हे फॉल्स अॅलिगेशन आहे, हे सिद्ध करावं लागेल ना?” “हे काम मी केलं नाहीय, हे मी स्वतःच्या तोंडून सांगेन. ते काही सिद्ध करू शकतील का?”

    “खोकन, तू नीट आठवून बघ. तुझ्या एखाद्या मित्राने तुला जामीन ठेवून कोणाकडून पैसे उसने घेतले होते का?”

    “जो जामीन राहतो, त्याचा काहीच दोष नसतो. परंतु त्याने पैसे परत दिले नाहीत, तर मात्र जमीनदार आपल्याला कोर्टात खेचू शकतात.”

    “इतक्या पैशांसाठी मी जामीन कशाला राहू? माझ्यावर कोणी विश्वास ठेवेल का?”

    “कदाचित बोलताना कमी पैसे म्हटलं असेल आणि प्रत्यक्षात जास्त पैसे घेतले असतील!”

    “अशा तऱ्हेचा एकही व्यवहार मी केला नाहीय.”

    “तू कधी कोणाला कोऱ्या कागदावर सही करून दिली होतीस का?”

    “बाबा, तुम्ही माझी उलटतपासणी घेताय का? कोऱ्या कागदावर सही देण्याइतका मी मूर्ख आहे, असं तुम्हाला वाटतं का? मित्रांशी मी पैशाचे कोणतेही व्यवहार करत नाही.”

    हे संभाषण थांबवत इंदिरेने त्यांना जेवायला यायची हाक दिली. त्यानंतर काही वेळाने सगळे झोपायला गेले. इंदिरेला झोप लागली असली तरी अमरनाथ जागेच होते. मनातली अस्थिरता काही केल्या कमी होईना.

    जयदीप सगळं सत्याला स्मरून सांगत होता का? अतिशय जोरदार निषेध केला नव्हता त्याने! त्याने नजरेला नजर देऊन पाहिलं नाही, दुसऱ्या दिशेला तोंड वळवून तो बोलत होता. शेवटी शेवटी तर तो चांगलाच रागावला होता.

    जयदीप काही प्रमाणात गोपनीय जीवन जगत होता का? संध्याकाळनंतर एक-दोन तास तो कुठे असतो? बरेचदा एक-दोन मित्र त्याच वेळात फोन करीत. अशा वेळी जय फोन घेतो का? इथल्या मुलांच्या वागण्यातला तपशील नीटसा समजत नाही.

    वकील नेमायला त्याने नकार दिला. का? त्याला खरोखरच तुरुंगात जावं लागलं तर फक्त घोटाळा होणार नाही, त्याच्या जोडीला समाजात तोंड दाखवायची सोय उरणार नाही. माझा मुलगा फसवणारा, लफडेबाज! शी! शी! शी! शी!

    अमरनाथ मध्यरात्री बाथरूमला जाण्यासाठी एकदा उठले होते.

    जयदीपच्या खोलीत अजूनही दिवा जळत होता. पोरगा झोपू शकला नव्हता!

    आईबाबांसमोर कितीही नकार दिला तरी नक्कीच एखादी चूक त्याच्या हातून घडली असणार! कोर्टाचं समन्स पूर्णपणे खोटं असू शकेल का?

    अमरनाथही रात्रभर झोपू शकले नाहीत.

    सकाळी अकरा वाजता कोर्टात हजेरी लावायची होती. एकट्यानेच जावं, अशी जयदीपची इच्छा होती. त्याने त्याच्या एकाही मित्राला यातलं काही सांगितलं नव्हतं. मुलाने तीव्र विरोध केल्यावरही अमरनाथ त्याच्याबरोबर गेले.

    जयदीपच्या वागण्यात कोणत्याही प्रकारचा उद्वेग नव्हता. त्याला ट्रॅमने जायचं होतं, पण अमरनाथनी टॅक्सी केली. ते जोरजोरात सिगारेटचे झुरके घेऊ लागले. त्यांच्या घशाला कोरड पडली होती. आता काय होईल, हा विचार त्यांच्या डोक्यात सतत भिरभिरत होता.

    कोर्टात पोचल्यावर जयदीपने प्रथम अमल दासगुप्तच्या वकिलाचा शोध घेतला. त्याची भेट झाल्यावर त्याच्या नाकाच्या शेंड्यावर समन्सचा कागद नाचवत नाचवत म्हणाला, “हे काय आहे, ते सांगा पाहू? ही थट्टा चालवलीय का आमची?”

    समन्सवर नजर टाकत ते म्हणाले, “मी कालच म्हटलं होतं, टायपिंगमध्ये प्रचंड घोटाळा झालाय. जयदीप नाही, असायला हवं होतं जयदेव सरकार. अनुकूल चॅटर्जी स्ट्रीट नाही, अनुकूल बॅनर्जी स्ट्रीट, त्याच नावाचा आणखी एक रस्ता आहे. आज सकाळी शोध घेऊ लागलो, तेव्हा समजलं, तो जयदेव सरकार फरार झालाय!”

    जयदीप अतिशय रागावून म्हणाला, “टायपिंगची चूक? त्यासाठी अभ्यास सोडून मला ओढाताण करत इथे यावं लागलं? फार शहाणे आहात!”

    ते सभ्य गृहस्थ हात जोडून म्हणाले, “मी माफी मागतो. दोष माझा नाही. कोर्टाच्या कारकुनाचा. काय करू सांगा! यांना काही सांगायची सोय आहे का?”

    अमरनाथच्या अंगातून थंडगार घामाच्या धारा ओघळत होत्या. आजच्याइतकं स्वस्थ त्यांना या आधी कधी वाटलं नव्हतं!

    त्यांनी जयदीपला मिठी मारली. अर्थात त्या आलिंगनात मनस्ताप नव्हता!

    जयदीपने कोणताही अपराध केला नव्हता. अपराधी ते स्वतः होते. ते मुलावर विश्वास ठेवू शकले नव्हते. तो खोटं बोलतोय, असा त्यांच्या मनात संशय होता. या उलट इंदिरा प्रथमपासून ठासून सांगत होत्या, ‘त्यांना समजत नाहीय. स्वतःच्या मुलाला ते ओळखत नाहीयत.’

    बाबा या नात्याची आज प्रथमच त्यांना प्रचंड लाज वाटू लागली.

    -oOo-

    (सुनील गंगोपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘के अपराधी?’ या बंगाली कथेचा मराठी भावानुवाद.)


    सुमती जोशी
    सुमती जोशी

    अनुवादिका सुमती जोशी या राज्य पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लेखिका, अनुवादिका आहेत. त्यांची ‘उत्क्रांती’, ‘बंगरंग’, ‘दैत्याचा बगीचा’, ‘मंत्र’ आदी स्वतंत्र तसेच अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
    ईमेल: sumatijoshi154@gmail.com



रविवार, २७ जुलै, २०२५

अँटेना

  • अनुनाद

    Sketch1

    आमच्या घरातला आदिम काळातला अँटेना काढून टाकून डिश अँटेना बसवण्यासाठी आज टेम्पोदा आमच्या घरी आला होता. गच्चीचा जवळ जवळ सगळा भाग करोगेटेड शिट्सनी झाकलेला होता. फक्त कोपऱ्यातली अँटेना लावलेली जागा मोकळी सोडलेली होती. त्यामुळे मौनाच्या सांगण्यावरून मोठ्या दादांनी तिथलं केबल कनेक्शन काढून टाकून डिश बसवायचं ठरवलं होतं. केबलवर मौनाला हवे असलेले चॅनेल्स बघता येत नव्हते!

    मौनाला कोणते चॅनेल्स आवडतात, हे तिचा धाकटा काका या नात्याने तिला जन्मापासून पहात असूनही मला अजून समजू शकलेलं नाही. तिला आज लाल आवडतो, तर दुसऱ्या दिवशी सफेद! आज सामोशाची प्रशंसा, तर उद्या जिलबी डोक्यात ठेवून नाचत राहते! तिला पाहून माझ्या मनात शंका येत राहते, आजकालची मुलं अशीच असतात का?

    राजूशी आपला ब्रेक अप झालाय, असं सांगून गेल्या दोन दिवसांपासून मौना खोली बंद करून बसून होती. राजू तिच्यावर फारच जबरदस्ती करू लागला होता, तिच्या पर्सनल स्पेसवर आक्रमण करत होता. ती कोणा मुलाशी बोलू लागली तर तो रागाने बेभान होऊ लागला होता. मौनाच्या मते, हे किती दिवस सहन करता आलं असतं? प्रेम करतेय, म्हणून इतरांशी बोलायचंसुद्धा नाही का? म्हणून तिने राजूला सोडचिठ्ठी दिली होती!

    राजूला सोडचिठ्ठी दिलीस, हे छान केलंस पण त्यामुळे मन खट्‌टू कशासाठी करतेयस? राजू काही तुला मस्का लावायला आला नाहीय. पोरगा तुला छान छान चिठ्ठया पाठवत असे. सतत तुझ्या हवं नकोचा विचार करत असे. सारा वेळ म्हणत असे, माझं प्रेम आहे तुझ्यावर! तरीही का आला नाही? मौना त्याला सोडचिठ्ठी देऊ शकत होती. ते टाळण्यासाठी राजू तिच्या भोवती नाचणार नव्हता! या देशात कायदेकानून नावाची चीज खरोखरच उरली नाहीय!

    लेकीचं मन विषण्ण झाल्यामुळे तिचे बाबा, माझे दादा असे वागत होते की वाटावं, एकाच वेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकार गडगडलंय! लेकीच्या उदास मनाला उभारी देण्यासाठी माझ्या दादांनी नाना उपाय योजना राबवल्या. मौनाने सांगितलं होतं, यापुढे या घरात केबल-फेबल चालणार नाही. डिश बसवावी लागेल. मन रिझवण्यासाठी तिला अनेक चॅनेल्स हवे होते. आमचा केबलवाला तीचं मन गुंतून राहील, असे चॅनेल्स देत नव्हता.

    असं करण्यामुळे राजू नावाच्या पोराचं धारिष्ट्य कसं लोप पावेल, ते मला समजत नसलं तरी माझ्या दादाला समजलं होतं. म्हणून तर जुनापुराना अँटेना काढून टाकून तिथे डिश बसवायची होती. आता मौना सगळं विसरून प्रचंड उत्साहाने त्याच्यासमोर बसून सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट करत होती. मला मजा वाटत होती. देशातल्या पोस्टातलं व्यवस्थापन कसं चालतं, हे समजत नसलं तरी अलीकडे सोशल मीडियावर पोस्टमनचा सुळसुळाट झालेला बघत होतो.

    मी विचारलं, “मौना, आता तुझं मन उदास नाहीय ना?”

    सेल्फीचा अँगल नीट जुळवता जुळवता ती म्हणाली, “कोणासाठी? त्या राजूसाठी? की जुन्या काळातल्या या अँटेनासाठी? काहीतरीच काय विचारतोयस काका? अलीकडचं लाडीगोडी लावायचं प्रेम असतं या तुमच्या डायनासोरचा छाप असलेल्या जुनाट अँटेनासारखं. सगळं स्क्रॅप करून टाकायला / मोडीत काढायला हवं!”

    मी हसलो. टेम्पोदांनी गंजलेला, मोडका अँटेना काढून टाकला होता. तो आणि त्याचा मदतनीस या दोघांनी मिळून प्लास्टिकच्या आवरणातून आणला होता नवीन डिश अँटेना!

    फ्लॅश बॅक १९८६

    उचक्या देत देत टी.व्ही. च्या पडद्यावर झरझर चित्रं दिसू लागली.

    दादा जोरात ओरडले, “सर्वनाश! हे काय झालं? बाबू, ताबडतोब जा आणि टेम्पोला बोलावून घेऊन ये. नक्कीच पुन्हा अँटेना चालेनासा झालाय.”

    इतक्या रात्री बाबा मला एकट्याला जाऊ देत नव्हते, पण मी वाट न बघता बाहेर पडलो. बारावं लागल्यावर कोणाला कार्ल लुई व्हावंसं वाटणार नाही?

    टेम्पोदांच्या घरी पोचेपर्यंतच्या मधल्या काळात मी कथेची पार्श्वभूमी सांगतो.

    श्याऐंशीच्या विश्वकपाची आज फायनल. त्या टीममध्ये ईश्वर असल्यामुळे आमचं घर आर्जेन्टिनाचं सपोर्टर.

    हातांनी, पायांनी, नाना प्रकारांनी गोल करून साऱ्या जगाला वेड लावत ईश्वर फायनलपर्यंत पोचला होता. आतापर्यंत ईश्वरच्या टीमने पश्चिम जर्मनीवर एक गोल चढवला होता. यानंतर काय होईल, ते माहीत नव्हतं. आज आर्जेन्टिनाचा विजय होणं अत्यावश्यक होतं, कारण गेल्या काही दिवसांपासून आमचं घर वाईट मनःस्थिती नावाच्या तळ्याच्या तळाशी बुडालं होतं. आर्जेन्टिनाचा विजय झाला असता, तर आमच्या घरात जरा उजेड-हवा खेळत राहिली असती.

    आता मनःस्थिती वाईट असण्याचं कारण सांगतो. माझी चुलत बहीण विनी!

    मोठ्या काकींना कोपऱ्यातल्या विनीच्या खोलीत एक लव्ह लेटर मिळालं होतं. त्यात विवाह-संसार या बाबतीतली कितीतरी निषिद्ध वाटावीत अशी विधानं लिहिलेली होती. बंगाली लोक सुट्टीच्या दिवशी दूरदर्शन चालू करून उत्तम कुमार आणि सुचित्रा यांचं प्रेम बघत असले, तरी घरातल्या मुलीने प्रेम केलं तर त्यांच्या घरी कुरुक्षेत्र घडणारच, ते अडवता येणार नाही, हे विनीदी साफ विसरून गेली होती!

    एके दिवशी हा कुळाला बट्टा लावणारा आणि सेन्ट्रल इंटलिजन्स कंपनीचा हिरो, ज्याच्याबरोबर विनीदीने असभ्यपणा केला होता, तो आहे तरी कोण, हे समजून घेण्यासाठी विनीदीला नानाप्रकारे प्रश्न विचारले होते.

    यातला एकही प्रश्नबाण विनीदीला घायाळ करू शकला नव्हता. विनीदी फक्त मिसेस सेन यांच्यासारखी हनुवटी उंचावून म्हणाली होती, ‘मी सांगणार नाही!’

    आत्या अरुणाचल प्रदेशात राहत असे. मुलीच्या शिक्षणासाठी विनीला आमच्याकडे ठेवली होती. अशा वेळी ती मुलगी जर अशा नकोत्या गोष्टीत अडकून पडली असती तर आम्ही बंगाली माणसं आणि बंगाली जातीचा ऐतिहासिक चेहरा सुरक्षित राहिला असता का? त्यामुळे हे सारं उघड झाल्यावर विनीदीला घरातून बाहेर जायला मज्जाव केला होता.

    मोठ्या काकांनी, विनीदीच्या बाबांनी तिच्या विवाहासाठी पत्रापत्री सुरु केली होती. इतकंच नाही तर राष्ट्रसंघालाही पत्र लिहावं, म्हणून त्यांनी एक पोस्ट कार्डही खरेदी केलं होतं. फक्त काकींनी धमकावल्यामुळे... जाऊ दे.

    आज विनीदीला बघायला येणार होते. त्यावेळी विनीदी काय गोंधळ घालेल कोण जाणे! त्यामुळेच आर्जेन्टिनाचा विजय होणं माझ्यासाठी अतिशय आवश्यक होतं. उजेड-हवा यांची नितांत गरज होती. अशा वेळी त्या अँटेनाने दगा दिला.

    सध्या अँटेना म्हणजे, बंगाली घराचा स्टेटस सिम्बॉल. तीन दांड्या किंवा पाच दांड्या असलेल्या अँटेनाच्या कृपेमुळे लाकडी शटर्स बसवलेल्या टी. व्ही. वर दूरदर्शन बघता येत असे.

    चित्रमाला, चित्रहार यांच्या जोडीला आठवड्यातून एकदा हिंदी आणि बांगला सिनेमा माझ्यासारख्या चातकांना उपलब्ध होत असे. काही जण त्या मोठ्या अँटेनाला एक लहानसा अँटेना जोडत असत. त्याला म्हणत बुस्टर. तो बेटा बांगला देशातले चॅनेल्स खेचून आणत असे. आमच्याकडे बुस्टर नव्हता. फक्त पाच दांड्या असलेला अँटेना होता. कधी कधी त्याची तार तुटून जाई आणि ती दुरुस्त करण्यासाठी आमच्या परिसरातल्या अठ्ठावीस वर्षांच्या एकमेव इलेक्ट्रिशियनला - टेम्पोदाला बोलवावं लागत असे. पोरगा फार चांगला होता, कधीही नाही म्हणत नसे.

    आजही मी हाका मारल्यावर त्याने झटकन दरवाजा उघडला.

    मी म्हटलं, “ताबडतोब चल, नाहीतर घरी कोलाहल माजेल.”

    डोळे चोळत आपली दुरुस्तीची साधनं असलेली बॅग घेऊन आणि डोक्यावर कवच-कुंडल असल्यासारखी टोपी चढवून टेम्पोदा म्हणाला, “या वयात तू ही कसली भाषा बोलतोयस!”

    मी हसलो. बारा वर्षे म्हणजे कमी आहेत का? मला बरंच काही माहीत असे. मला माहीत होतं, दादा काडेपेटी हातात घेऊन हळूच गच्चीवर का जातात! शेजारच्या घरातली शुक्ला आत्या ओढणी काढून टाकून मॅक्सी घालून रस्त्याच्या कोपऱ्यावर का उभी राहते! जेड स्टोन बसवलेल्या महालात डायना पामारबरोबर काय करत असते!

    मी चालता चालता विचारलं, “उद्या गुजरातला जाणार का?”

    टेम्पोदा म्हणाला, “होय रे! माहितेय ना तुला, मला उत्तम नोकरी मिळालीय.”

    घरी पोचल्यावर टेम्पोदांनी टॉर्च बाहेर काढला. मग मला खालीच थांबायला सांगून तो एकटाच गच्चीवर गेला. या घरातल्या सगळ्या गोष्टी टेम्पोदांना तोंडपाठ असत! या आधी कितीतरी वेळा अँटेनाने आम्हाला त्रास दिला होता.

    मोजून साडेसहा मिनिटात चिडीक असा आवाज होत टीव्हीवर चित्र दिसू लागलं. मी काही बोलायच्या आधीच काका इतक्या मोठ्याने ओरडले, की मैदानावरच्या आर्जेन्टिनाच्या खेळाडूंनी चपापून मागे वळून पाहिलं.

    Sketch2

    मनःस्थिती ठीक नसल्यामुळे गच्चीवरच्या आपल्या खोलीत झोपलेली विनीदी आणि तळ मजल्यावर झोपलेली आजी सोडून आम्ही सारे आज खालच्या टीव्हीच्या खोलीत बसलो होतो.

    त्यात मधेच एकदा रागीट आवाजात काकी म्हणाली, “गुरासारखे ओरडताय कशासाठी? आईची झोपमोड होईल ना!”

    आजोबा दोन वर्षांपूर्वीच देवाघरी गेले होते. आजी म्हणजे सवयीची गुलाम! त्यामुळेच जितका वेळ झोपेल तितका वेळ घरच्या मंडळीना शांतता लाभणार होती!

    खेळ सुरू झाला असल्यामुळे काकांनी प्रतिवाद करत बोलणं वाढवलं नाही. मी बघत होतो, गच्चीवरून खाली आल्यावर टेम्पोदासुद्धा खोलीच्या दरवाजापाशी उभे होते. नजर टीव्हीच्या स्क्रीनवर.

    काका म्हणाले, “टेम्पो बस आणि मॅच बघ. खेळ संपला की घरी जा. पुन्हा जर काही बिघाड झाला तर!”

    बोलणं न वाढवता टेम्पोदा टीव्हीवर नजर रोखून दरवाजापाशी बसला.

    अचानक दरवाजापाशी येत आजीने विचारलं, “काय रे टेम्पो, तू गेला नाहीस?”

    काकीने दबक्या आवाजात काकांना दम भरला, “बघितलंत ना!”

    टेम्पोदा चकित होत विचारू लागले, “जाणार कुठे? मी खेळ बघतोय ना!”

    आजी म्हणाली, “झोपमोड झाली, तेव्हा खिडकीतून बघत होते.”

    काका ओरडू लागले, “अगं आई, हे नवीन काय सुरू केलंस? आर्जेन्टिनाचा गोल झाला तर बरं होईल. तू जा आणि झोप पाहू मुकाट्याने!”

    आजी मान हलवत म्हणाली, “ते ठीक आहे! परंतु... अच्छा, मी जाते.”

    आजीसाठी आर्जेन्टिना कसा काय गोल करेल, ते समजलं नसलं तरी आर्जेन्टिनाने आणखी एक गोल केल्यावर त्याच्या बदल्यात हावरटासारखे आणखी दोन गोल खाऊन टाकले! रागाने माझ्या पायापासून डोक्यापर्यंतच्या साऱ्या शरीराची आग आग होऊ लागली. असली कसली तुझी टीम ईश्वर!

    कडेकोट बंदोबस्तात असलेल्या ईश्वरच्या अंतरात्म्याला बहुतेक माझं बोलणं ऐकू गेलं असावं. त्यामुळे पुढच्या चौऱ्याऐंशी मिनिटात एकदा संधी मिळाल्याबरोबर त्यांनी बुरुचागाच्या करवी पश्चिम जर्मनीचा धुव्वा उडवून टाकला!

    ते पाहिल्यावर काका ताडकन उडी मारून उभे राहिले. मला, टेम्पोदाला, मिठ्या मारत आनंदातिशयाने किती जोरात ओरडले! आजीला मिठी मारायला गेले, तेव्हा मात्र ‘पाडशील मला’, असं म्हणत आजीने काकांना दूर लोटलं.

    जिंकल्यामुळे निमिषभरात काकाचं मन नबाब-बादशहासारखं झालं. सगळ्यांकडे नजर टाकत ते म्हणाले, “अशा दिवशी विनी वाईट वाटून एकटी बसून राहणार, हे होऊच शकणार नाही. चला, सगळ्यांनी तिच्या खोलीत जाऊ या. ती आपल्याच घरची पोर आहे, होय ना!”

    गच्चीवरच्या एका कोपऱ्यात विनीदीची खोली. तिथे गेल्यावर आम्ही सारे थबकलो! दरवाजा सताड उघडा! दिवा जळत होता! नीटनेटकी, आवरून ठेवलेली खोली. परंतु विनीदी तिथे नव्हती! बिछान्यावर एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात लिहिलं होतं, “मी त्याच्याबरोबर निघून जातेय. आमचा शोध घेऊ नका.”

    चिठ्‌ठी हातात घेऊन काका थरथर कापू लागले. म्हणाले, तो…? तो म्हणजे कोणता प्राणी? ऐकून ठेवा. विनी आपली कोणी लागत नाही. हा कट आहे... महाभयंकर कट आहे. (सेन्ट्रल इंटलिजन्स एजन्सीचा हा कट आहे का, अशी चौकशी मी केली नाही)

    आता

    डिश बसवून झाल्यावर खाली उतरून टेम्पोदांनी आपली टोपी सारखी केली. आजही कवच-कुंडल! तो हसला आणि म्हणाला, “सवयीने घातली रे बाबू!”

    Sketch3

    दुपारच्या उन्हात मी त्या माणसाला पाहिलं. आता स्टेशन रोडवर टेम्पोदांचं इलेक्ट्रॉनिक्सचं मोठं दुकान आहे. दुकानात बारा कर्मचारी. तरीही आमच्या घरातलं काम तो स्वतः येऊन करतो. गुजरात फार दिवस मानवलं नाही या माणसाला.

    मी म्हटलं, “मोडका अँटेना फेकून...”

    “नाही, तो टाकून देऊ नकोस. मी तो घरी घेऊन जाईन.” जवळच असलेली विनीदी म्हणाली.

    मी नुसता हसलो. मला आठवली एकतीस वर्षांपूर्वीची ती रात्र! रहस्यमय वाटावं, असं विनीदीचं नाहीसं होणं.

    खरं पाहता त्या रात्री आजींनी टेम्पोदाला नाही तर विनीदीला पाहिलं होतं. टेम्पोदांनी स्वतःच्या मोठ्या बॅगेतून शर्टपँटचा एक सेट आणला होता. घरातली सारी मंडळी खाली एकाच खोलीत बसली होती. गच्चीवर जाऊन अँटेना बदलायच्या आधी टेम्पोदांनी विनीदीला ते कपडे दिले होते. मग कोणालाही सुगावा लागू नये म्हणून टेम्पोदांनी आमच्यासमवेत बसून संपूर्ण मॅच बघितली होती. त्यावेळी विनीदी गुपचूप घराबाहेर पडून टेम्पोदांच्या घरी जाऊन लपली होती. आजीनी बरोबर बघितलं होतं, पण तीचं बोलणं कोणी ऐकून घेतलं असतं तर ना!

    दुसऱ्या दिवशी ती दोघं गुजरातला निघून गेली. एक महिन्याने पत्र पाठवून विनीदीने सगळी हकीकत सांगितली होती. तिने आपला बेत कोणाला समजू दिला नाही. त्या रात्री सगळी तळ मजल्यावरच्या खोलीत असतील, हे विनीदीला माहीत होतं. हीच संधी साधून गेमचा हाफ टाइम झाल्यावर मी अँटेनाची तार कापून टाकली. अपेक्षेनुसार टेम्पोदाला बोलवायला मलाच जावं लागलं. अरे बाबांनो, प्रेम नसलं तर अर्ध्या रात्री अँटेना दुरुस्त करायला कोणी येईल का? इतक्या वर्षानंतर आज काका नाहीत, बाबा नाहीत. मीही हे सगळं विसरलो होतो. टेम्पोदांचा आम्हाला अभिमान वाटतो. विनीदीलाही सारे वाखाणत असतात. म्हणतात, “विनी ही खरोखरच गुणी पोर आहे. अशा अनाथ, गरीब मुलासाठी तिने सगळ्याचा त्याग केला. अशा प्रेमाचा विचार तरी करता येईल का?”

    काठीचा अँटेना कालबाह्य झालाय. डिश अँटेनाने त्याला बाजूला सारलाय. नुसतं दूरदर्शन मौनाला पुरेसा वाटत नाही. जेव्हा इतर काहीच उपलब्ध नव्हतं, तेव्हा हा एक अँटेनाच सगळ्यांना रिझवत असे. ईश्वर दर्शन घडवत असे; याचा त्यांना विसर पडतो.

    मी पाहिलं तेव्हा मौना डिश अँटेनासमोर उभी राहून सेल्फी काढत होती. एका बाजूला बाद केलेल्या, मोडक्या, जुनाट अँटेनावरून हळुवारपणे हात फिरवत होती, आमची रुपेरी केस असलेली विनीदी. आमच्या सगळ्यांच विनीदी!

    अनुभवाने मला समजतंय हे सारं!

    -oOo-

    (स्मरणजित चक्रबर्ती यांनी लिहिलेल्या ‘अँटेना’ या बंगाली कथेचा मराठी भावानुवाद.)

    सर्व रेखाचित्रे : सागर शिंदे (७०३०९९००८१)


    सुमती जोशी
    सुमती जोशी

    अनुवादिका सुमती जोशी या राज्य पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लेखिका, अनुवादिका आहेत. त्यांची ‘उत्क्रांती’, ‘बंगरंग’, ‘दैत्याचा बगीचा’, ‘मंत्र’ आदी स्वतंत्र तसेच अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
    ईमेल: sumatijoshi154@gmail.com